विपरीत बुद्धी
- ना.रा.खराद
बुद्धीचा जेव्हा दुरुपयोग केला जातो, तेव्हा ती बुद्धी विपरीत बुद्धी असते.बुद्धिमान असणे म्हणजे चांगले असणे होत नाही किंबहुना बुद्धीच्या जोरावरच सर्व वाईट आणि चूकीचे काम केले जाते.ज्या बुद्धीचा उपयोग सदवर्तनासाठी
होत नाही,ती बुद्धी नासकी,सडकी विपरीत असते.
बुद्धी मानवासाठी वरदान आहे, परंतु जेव्हा बुद्धीचा उपयोग इतरांचे शोषण करण्यासाठी,छळण्यासाठी,गंडविण्यासाठी होत असेल तर ती बुद्धी भ्रष्ट झालेली असते.बुद्धीचा वापर आपण कसा आणि कशासाठी करतो यावर
तीचे योग्य अयोग्य ठरते.कित्येकवेळा अशा बुद्धीमुळे आपण अडचणीत येतो,कारण बुद्धिच्या बळावर आपण सर्वकाही करु शकतो असेच आपणास वाटत असते.
बुद्धी एकप्रकारे ताकत आहे, परंतु ताकदीचा दुरुपयोग कधीही महागात पडू शकतो.याच कारणांमुळे कमी बुद्धीमान उत्तम जीवन जगतात.ते सरळमार्गी असतात, परंतु कुटिल डाव कुटील बुद्धीचे लोक आखत असतात, परंतु त्यामध्ये ते यशस्वी होण्याऐवजी आपले पितळ उघडे पाडतात.
बुद्धी विवेकशील, तर्कशुद्ध असेल तर तीचा खूप उपयोग होतो,जीवन सर्वांगीण समृद्ध होत जाते.परंतू त्याच बुद्धीचा उपयोग जर स्वार्थासाठी केला, छक्के पंजे खेळण्यासाठी केला,तर तीच बुद्धी आपला घात करते.बुद्धी जितकी सरळ असेल तितकी उत्तम,ती जर वाकड्या मार्गाने चालली तर अडचणीत आणते.
आपण ज्यास बुद्धी समजतो ती विपरीत असू नये, विपरीत बुद्धी विपरीत घडवते.बुद्धीचा उपयोग सद्विचार आणि सद्ववर्तनासाठी केला जावा.खलबुद्धी नसलेली बरी,कारण तो बुद्धीचा विनाशकारी मार्ग आहे.बुद्धीने नेहमी चांगला विचार केला पाहिजे.
बुद्धी मानवासाठी सर्वात मोठी देणगी आहे, परंतु तीचा गैरवापर कधीही चूकीचाच असतो.
बुद्धीमान असणे गौरवाचे आहे, परंतु ती बुद्धी विपरीत असू नये इतकेच!