शेतकरी हा शेतात बैलांसोबत राबतो.

                    शेतकरी
                              - ना.रा.खराद
जगण्यासाठी जे काही खाद्य हवे असते ते सर्व मातीतून मिळते आणि मातीत आपली मती आणि श्रम मिसळून त्यातून ते खाद्य उगवणारा अन्नदाता शेतकरी आहे. शेती उद्योग एक पारंपरिक व्यवसाय आहे.अनेकांच्या अनेक 
पिढ्या शेतात राबल्या . शेतात अत्यंत काबाडकष्ट करावे लागतात.ऊन,वारा,पाऊस सर्व सहन करावा लागते.त्याची उपजीविका ती काळी माती भागविते.शेतकऱ्यासाठी त्याचे शेत जीव की प्राण असते.कोरडवाहू शेतीत तर काहीच पिकत नाही.अल्पभूधारक शेतीवर गुजराण होऊ शकत नाही.शेतकरी कायम अडचणीत असतो.मोजके शेतकरी
सधन आहेत.ओलिताखाली जमीन असेल, त्यासाठी लागणारे भांडवल असेल तरच शेतीतून काही पदरात पडते.नुसत्या शेतीवर अवलंबून रहाणे आता शक्य नाही.जोडधंदा आवश्यक आहे.अल्पकाळात उत्पन्न देणारी पिके जसे भाजीपाला,फळे वगैरे घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याची दैना काहीकेल्या फिटेना.
शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना आखणे गरजेचे आहे.त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे.
शेतकरी राजा किंवा बळीराजा म्हणून त्याचा गौरव केला जातो, परंतु त्याची हलाखीची परिस्थिती बदलली जात नाही.त्याच्या कष्टावर गुजराण करणारा समाज त्याला विसरला आहे,त्याचे सोयिस्कर शोषण केले जाते.
शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय आहे.किमान व्यवस्थित जगण्यापुरते तरी शेतकऱ्यांकडे असले पाहिजे.तशी तजवीज शासनाने करायला हवी.वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल होतो,त्यास कुठला भत्ता नाही, त्याच्या शेतमालाचा भाव वाढत नाही,मग त्याने जगायचे कसे.अनेक शेतकरी मुलीचे लग्न शेती विकून करतात.जगण्याचे शेवटचे साधन तो गमावून बसला तर उपजीविकेचे साधन उरत नाही.
काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी, आपल्या प्रामाणिकपणाची शिक्षा भोगत आहे.मुक्या प्राण्यांना जो
खावू घालतो,न चूकता पाणी पाजतो,त्या शेतकऱ्यांसाठी
आपण काय करतो, हा विचार कधी कुणी करतं का?
शेतकरी या देशाचा आत्मा आहे, श्वास आहे,तो जोपर्यंत राबतो तोपर्यंतच हा देश जगणार आहे.शेतकऱ्याविषयी
दया नको,त्याचा तो हक्क आहे.जसे सैनिक शत्रूपासून देशाला वाचवतो,तसा शेतकरी देखील देशाला उपाशी मरू देत नाही.
शेतीला वीज, शेतमालाला भाव आणि सिंचन व्यवस्था
अशा बाबी खुप महत्वाचा भाग आहे.त्याच्या मुलांचे शिक्षण मोफत व्हावे, तेव्हा कधीतरी त्यांचे जीवन बदलेल.
शेतीमालाला भाव मिळवून दिला पाहिजे.अन्नदाताच जर उपाशी रहातअसेल तर कसे होणार.शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणून सन्मान नाही.जो कष्ट करतो त्याचा प्रथम मान हवा.त्यासाठी आपली धारणा बदलणे गरजेचे आहे.शेतीमुळे गांव सोडता येत नाही.गावात राहून पोट भरत नाही मग काय करायचे,हा यक्ष प्रश्न आहे.
अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.
त्यासाठी खास उपाय असावेत.प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकरी हाच या समाजाचा कणा आहे तो मोडकळीस येऊ नये याची खबरदारी शासनाने घेतलीच पाहिजे. 
       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.