- ना.रा.खराद
संस्कार हा शब्द मी खुप ऐकलेला आणि वाचलेला आहे, परंतु मी कधीच त्याबद्दल काही समजू शकलो नाही,कारण त्याची व्याप्ती खूप आहे आणि तो आवाक्यात न येणारा विषय आहे.त्याचा ऊहापोह करण्याचे धाडस देखील होत नाही, किंवा संस्कार या विषयावर माझे चिंतन तोटके,अपूरे किंवा चूकीचे ठरु शकते, ह्याची भीती मला कायम वाटत आली आहे.
मी अनेक प्रकारचे संस्कार ऐकले आहेत.अगदी जन्माअगोदर सुरु होऊन, अंत्यसंस्कारापर्यंत आणि तदनंतर देखील संस्कार असतात.बालकांवर होणारे किंवा झालेले संस्कार याबाबत जास्त विचार होतो.
चांगले संस्कार आणि वाईट संस्कार असे संस्काराचे विभाजन केले जाते, म्हणजे संस्कार फक्त चांगलेच असतात असे नव्हे.संस्कार हा कर्मकांडाचा भाग असतो, किंवा रुजवण्याचा असतो.
संस्कार हे संगतीने, संपर्कातून होत असतात.संस्कार हा एक प्रकारचा संसर्ग आहे.काही संस्कार जाणीवपूर्वक रुजवले जातात.संस्कार वर्तनातून दिसून येतात.संस्कार निश्चित केलेलेही असतात.
शाळा महाविद्यालये ही संस्काराची केन्द्रे मानली जातात.संत ,महात्मे संस्कार रुजविण्यासाठी प्रयत्न करतात.जो व्यक्ती जशा वातावरणात वावरतो ,तसे त्यावर संस्कार होतात हे जरी खरे असले तरी तितकेसे खरे नाही.संस्कार लादलेले किंवा थोपवलेले असतात, ते टिकाऊ नसतात.
संस्कार कुचकामी ठरत असतात.संस्कार बदलत रहातात.संस्कार एक सवय ठरते.संस्कार फक्त औपचारिकता ठरु नये.
संस्कार शिदोरी मानली जाते.घराण्याचे,जातीचे,धर्माचे,देशाचेही संस्कार असतात.संस्कार ही आपली ओळख असते.
संस्कार कायम सोबतीला असतात.संस्काराविना मनुष्य मूल्यहीन भासतो.संस्कार एक सामाजिक गरज आहे.कुठे पराकोटीचे तर कुठे तकलादू संस्कार असतात.संस्कारातूनच संस्कृती जन्म घेत असेल.संस्कार हे एक वळण आहे, मार्ग आहे.संस्कार लावले जातात तसे ते लादलेही
जातात.संस्कार निकोप,निर्भेळ असतात असे नाही, कित्येकवेळा ते फोल , कुचकामी ठरतात.
संस्कारची केंद्रे आहेत,कथा आहेत, मालिका आहे.कुणावर कशाचे आणि कसे संस्कार होतात, हे आपण बघतोच.संस्काराची साधने वाढली की संस्कारही भरकटत जातात.स्वत:चा विवेक जागा झाला तरच संस्कार रुजतात नसता ते कुजतात आणि कुसंस्काराची दुर्गंधी पसरते.