दगडांना कुणी काहीही समजो,मी मात्र दगडाला देव समजतो .दगड हा आपल्या संपूर्ण जीवनासाठी 'मैलाचा दगड' आहे.दगडाविना जीवन अशक्य आहे.भले बालपणी शिक्षक मुलांना दगड म्हणत असतील, परंतु त्याच दगडातून मूर्ती घडविण्याचे काम शिक्षकांनी केले
आहे.
दगड निर्जीव वस्तू असेल परंतु सजीवांचे जीवन
दगडांनी सुकर केले आहे.आता तर विश्वास फक्त निर्जीव वस्तूंवरच ठेवावा असा काळ आहे.
दगडांचे वजन मी सांगणे गरजेचे नाही.समुद्राच्या
तुफानी लाटा रोखण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे.दगडाकडे बघून चालावे लागते.त्यास लाथ
मारली तो प्रतिकार करतो,शिक्षा देतो.
दगडही कित्येक आकाराचे असतात,पाहिजे तिथे उपलब्ध असतात.मोठमोठ्या इमारतीचा
तोल सांभाळण्यासाठी स्वतः ला गाडून घेत असतात.शाश्वती देण्यासाठी आपण ' काळ्या
दगडावरची रेघ 'म्हणतो.
देव देखील दगडांचे बनवले जातात.टिकाऊपणा
हां दगडांचा गुणधर्म आहे, दिखाऊपणा नाही.
मानवाने दगडांचा गैरफायदा घेतला आहे.तो
'दगडफेक' करतो.
अनेक गावांत दगडांचे ओटे असतात,त्यावर बसून कित्येक पिढ्या गावगप्पा करतात.दगड
मातीच्या संगतीत राहतात.खडे,गोटे ,वाळू,असे
दगडांचे जवळचे नातेवाईक असतात.मानवाच्या
उपयोगी पडणे हा दगडधर्म आहे.
विवाह जुळवण्यासाठी सुपारी फोडण्यासाठी
दोन दगडांचा वापर होतो.न डगमगणे ,हा दगडांचा स्वभाव आहे.जिथे ठेवाल तिथेच राहणे
असे इमान आहे.
अभ्यासातले दगड इतर क्षेत्रात निपूण असतात.
दगडांमध्ये देव आहे की नाही , माहिती नाही , परंतु त्याचे उपयोग बघता तो नसेल असे मूळीच
वाटत नाही.माझी दगडावरची श्रद्धा अढळ आहे.मी मूर्तीपूजक नसलो तरी दगडपूजक नक्कीच आहे.
- ना.रा.खराद