कुणी समजून घेता का हो?

                                  कुणी समजून घेता का हो?
आपल्या अवतीभवती सगळीकडे फक्त एकच ओरड ऐकू येते, " मला कुणी समजून घेत नाही." आपण प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला एकदा विचारलाच पाहिजे की आपण इतरांना समजून घेतो का? 
आपण समजावून सांगतो पण समजून घेत नाही.आज माणसाला जर कशाची गरज असेल तर ती इतरांना समजून घेण्याची.जो पर्यंत इतरांच्या अडचणी, भावना , विचार आपण लक्षात घेत नाही,तो पर्यंत खरे काय ते आपणास समजणारच नाही.
 बालकांच्या, वृद्धांच्या, स्त्रियांच्या, गरीबांच्या काही व्यथा असतात,त्या समजून घेतल्या पाहिजेत.नसता ते कोलमडून जातात, निराश, दुःखी होतात.समजून न घेतल्याने खुप अघोरी प्रकार घडतात.मनामध्ये दडलेले भयंकर असते, हळूहळू ते विषारी बनते आणि नको ते प्रकार घडतात.कोणत्याही व्यक्तीला जो आपल्या संपर्कात आहे,त्यास योग्य रित्या समजून घेतले पाहिजे.तर तो कोलमडून पडणार नाही.तुम्ही फक्त मानसिक आधार द्यायला शिका.
आपण इतरांना समजून घेत नाही म्हणूनच इतर आपल्या पासून दुरावतात.आपल्याच तोऱ्यात किंवा तऱ्हेने वागणारी माणसे इतरांना बिलकुल समजून घेत नाही.
आजचे अनेक प्रसिद्ध नेते,लेखक, तत्वज्ञानी, चित्रकार,गायक यांना त्यावेळी कुणी समजून घेतलेले नव्हते.
  इतरांविषयी सहानुभूती,प्रेम असल्याखेरीज समजून घेणे शक्य नसते.घरात देखील आई-वडील आपल्या मुलाला
समजून घेणारे नसतील तर त्या मुलाचे मातेरे होईल.गरीब लोकांच्या अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.
अगोदरच त्रस्त लोकांना अधिकचा त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे.
 बहुतेक वाद किंवा भांडणे समजून न घेतल्याने किंवा गैरसमजुतीमधून होतात.आपण सौजन्यशीलता बाळगली तर भांडणे थांबतात.एक सौहार्दाचे वातावरण निर्माण होते.
  शाळेमध्ये शिक्षकांनी तर प्रत्येक मुलाला अगोदर समजून घेतले पाहिजे.सरसकट उपदेश किंवा शिक्षा कधीच योग्य
नसते.मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती हवी.मुलांचे भावविश्व उलगडून बघता आले पाहिजे.मुलांच्या पाठीवर
कधीतरी सहानुभूतीची थाप पडली पाहिजे.मुलांना बोलते करुन त्यांना समजून घेता आले पाहिजे.
नवरा-बायको या नात्याने तर एकमेकांना समजून न घेण्याचा चंगच बांधलेला असतो, मात्र दोघेही एकच तक्रार करतात," मला तो किंवा ती समजून घेत नाही."
  इतरांच्या यातना, तक्रारी, अपेक्षा, आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत.मला काही सांगू नकोस, गप्प बस, मला तुझे काही ऐकायचे नाही अशा प्रकारच्या उर्मटपणामुळे मानवतेची, नैतिकतेची पायमल्ली होते व दबावाचे,उपेक्षेचे,रुक्षपणाचे
एक अमानवीय वातावरण तयार होते.
समजून घेणे माणसाची फार मोठी गरज आहे.जो समजून घेत नाही, त्याच्याविषयी आपलेपणा वाटतो नाही,याउलट समजून घेणारी परकी माणसे देखील आपली वाटू लागतात.
इतरांचे दुःख,अडचणी समजून घेता आल्या तर मानवाच्या अनेक समस्या सुटतील.पिळवणूक, छळवणूक थांबेल.आपल्या समजून घेण्याच्या वृत्तीमुळे पीडितांना दिलासा मिळेल.मानसिक उद्विग्नता थांबेल.
एकमेकांना समजून घेतले तर आयुष्य सुकर होईल.
                          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.